Woman's Day निमित्त या वर्षी ६ मार्च २०२२ रोजी वी अस अन अवर फाउंडेशन तर्फे "Financial awareness among Society" संबंधित चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये Stocks, Mutual funds, Insurance, Cryptocurrency, etc. अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले गेले. ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमातून छान प्रतिसाद मिळाला.
टीमने थोड्या कालावधीत भरपूर मेहनत घेतल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
येत्या काळात असे बरेच sessions आयोजित करण्यात येतील, जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल.
कोविड-१९ मुळे आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींपैकी बरेच जण हे जग सोडून गेले. त्यातही जेव्हा घरातील प्रमुख व्यक्ती आपला जीव गमावते, ती कल्पनाच करणे अवघड होते. काही कुटुंबे गेली दीड वर्ष कठीण परिस्थितीत जगत आहेत. अशा कठीण परिस्थितीत वी अस अन अवर फाउंडेशन तर्फे कुटुंबांना सहाय्य करण्यात आले.
या उपक्रमामधून अहमदनगर आणि आसपासच्या कुटुंबांना साधारण दीड महिन्यापर्यंत अन्नखर्चात बचत होईल इतका किराणा सामान पुरविला गेला.
वी अस अन अवर फाउंडेशन तर्फे महिला दिन २०२१ चे औचित्य साधून नगर मधील २ शाळांतील मुलींसाठी 'सॅनिटरी पॅड्स वेण्डिंग मशीन (Sanitary Pads Vending Machine)' बसवण्यात आले.
"दुर्बलसेवायै तत्परः।" हे संस्थेचे ब्रीदवाक्य जपत अत्यंत गरजू असलेल्या अंबिका विद्यालय, केडगाव आणि पेमराज गुगळे हायस्कूल, माळीवाडा या शाळांची निवड केली गेली. संस्थेतर्फे दोन्ही शाळेतील मुलींसाठी डॉ. कांबळे व डॉ. ठाकूर या स्त्रीरोग तज्ज्ञांचे 'Menstrual hygiene' या विषयावर मार्गदर्शन केले गेले. संस्था यापुढेही स्त्रियांचा गौरव अशाच कामातून करत राहील.
वी अस अन अवर फाउंडेशन, आणि आत्मा, कृषी विभाग, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव उज्जनी येथील २० शेतकऱ्यांच्या ग्रुपला ऑरगॅनिक शेतीबद्दल मार्गदर्शन, त्याचप्रमाणे १०० लिटरचे २० ड्रम (कल्चर बनवण्यासाठी) वाटप करण्यात आले.
वी अस अन अवर तर्फे कोरोना काळात नगर तालुक्यातील १००हून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये नृत्य, वक्तृत्व, इंग्रजीत कथा सांगणे या स्पर्धा घेण्यात आल्या. २००हून अधिक मुलांनी यात भाग घेतला. बक्षीस म्हणून मुलांना विविध शालोपयोगी साहित्य भेट दिले.
यासाठी पंचायत समिती, नगर आणि जिल्हा परिषद केंद्र शाळा, गुंडेगाव यांची मदत झाली.
२०२० या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलं..!
''पैसा म्हणजेच सगळं काही नसतं'' असं थाटात सांगणाऱ्या आपल्या सर्वांना "पैसा म्हणजे खूप काही असतं" हे मान्य करणंही शिकवलं.
घरकाम करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या, आपल्या लेकरांचं पोट भरणार्या, कित्येक माता-भगिनींना यावर्षी घरी बसायची वेळ आली. दिवाळीच्या मुहूर्तावर फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांची दिवाळी गोड करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. यानिमित्त नगर शहरातील ९ अत्यंत गरजू स्त्रियांना संस्थेतर्फे किराणा दिला गेला. हा कठीण काळ सरेपर्यंत किमान पुढची २-३ महिने त्यांच्या घरात चूल पेटती राहावी, हा यामागचा उद्देश!
संस्था आपल्या सर्वांनाही विनंती करते की, हळूहळू पूर्वपदावर येत चाललेल्या या प्रवासात, आपणही जर अशा 'मावशी' मंडळींना काही दिवस बंद केले असेल, तर आता योग्य ती काळजी घेऊन त्यांना पुन्हा रुजून करून घ्यावे. आपल्या परीने शक्य ती मदत आपण वेळोवेळी त्यांना करतच आला असाल यात शंका नाही!
जून महिन्यात राबवण्यात आलेल्या सीड बॉल इव्हेंट अंतर्गत सीड बॉल बनवण्यापासून ते सीड बॉल योग्य ठिकाणी पेरणी पर्यंतचा सुंदर, निसर्गाने परिपूर्ण असा प्रवास संस्थेने साधला.
सीड बॉल = खत + काळी माती + झाडाची बी या तिन्ही गोष्टींनी परिपूर्ण असलेला गोळा. ज्याला मातीत पेरल्या पेरल्या, एका पावसातच अंकुर फुटतो आणि त्याचे लवकर झाडांत रूपांतर होते. असे करंज आणि आवढा या झाडांच्या बियांनी एकजीव झालेले ९१० सीड बॉल संस्थेतर्फे बनवण्यात आले, आणि ते मीरावली बाबा पहाड,अहमदनगर येथे पेरण्यात आले. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विशेष प्रकारची दक्षता प्रत्येक सदस्यातर्फे घेण्यात आली. संपूर्ण जगात पर्यावरणाविषयी समस्या वाढत आहेत, वातावरणात शुद्ध हवा आणि निसर्गाचं समतोल राखण्याच्या प्रयत्न यासाठीसुद्धा संस्थेचे कार्य पर्यावरणाबाबत महत्वपूर्ण ठरत आहे.
दिनांक १५ जून २०१९ रोजी मांजरसुंबा व्हॅली आणि डोंगरगण येथे We Us n' our Organization तर्फे जवळपास ३०० सीड बॉल्स पुरण्यात आले. बी पेरून वृक्षांची लागवड करण्याच्या पारंपरिक पद्धतीला सीड बॉल्स हा एक अत्यंत कमी खर्चिक आणि अधिक आउटपुट देणारा पर्याय ठरू शकतो.आपल्याला ह्या कार्यात *NSS- Sinhgad College Engineering, Vadgaon(Bk.) Pune* यांचे विशेष सहकार्य लाभले .
माती आणि शेणाच्या मिश्रणात एखादी 'बी' घालून तयार करण्यात आलेले हे चिखलाचे गोळे बनवण्यास अत्यंत सोपे व अगदी सोयीस्कर अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे पर्यावरणासंबंधी आपला स्नेह जपणाऱ्या पर्यावरण प्रेमींसाठी निश्चितच हा एक चांगला पर्याय ठरेल यात कुठलीही शंका नाही.
जगातील प्रत्येक व्यक्ती हा गर्भश्रीमंत नसतो. अजाण झाल्यावर दौलतीच्या दुनियेत हातपाय मारून तो संपती कमावतो. मग संसाराचा गाडा ओढतो, आपल्या बायका-मुलांच्या गरजा भागवून, त्याची हौसमौस पूर्ण करण्यात तो गुरफटून जातो. कधी मॉलमध्ये महागड्या वस्तू खरेदी करताना, कधी सिनेमाला गेल्यावर खर्च करायला, गाडी, बडेड मोबाईल घेताना तो कधीच विचार करत नाही उलट खर्चाचा विचार केला तर स्वतःलाच ठणकावून सांगतो, "आपण पैसे खर्च करण्यासाठीच कमावतो ना? मग का एवढा विचार?" अस तो स्वत:च्याच मनावर बिंबवतो.
हे सगळं असताना, आपण आज बघतोय की आपलं कोल्हापूर-सांगली पुराने गिळकृत केलंय. तेथील लोक मदतीसाठी गयावया करत आहेत. असे असताना आपण स्वस्थ तरी कसं बसायचं? मग किती दिवस गप्प राहणार? दुसऱ्याच्या मदतीचे फक्त व्हिडिओच पाहत बसणार की तुम्ही पण सरसावणार मदतीला ?
मग शेवटी आम्ही सर्वांनी निश्चय केला, मदतीचा, आपल्यांना झालेल्या त्रासातून आपणच मुक्त करण्याचा, भेदरलेल्या पूरग्रस्तांना, सदन सुजन पण पुराच्या पाण्याने पुरते हादरलेल्या आपल्याच लोकांना मदतीचा हात देण्याचा. सांगली-कोल्हापूर शहरी भागात बरीच मदत मिळत होती, पण खेड्याचे काय? तेथील लोक अजूनही मदतीविना घराचे छप्पर, उंच सखल ठिकाणे अशा गोष्टींच्या आधारावर जगत होते. प्यायला पाणी नाही, गेली कित्येक दिवस विजेचा पुरवठा नाही, सर्वकाही उध्वस्त. उरले होते ते फक्त भयाण वाऱ्याच्या आवाज आणि मदतीच्या हाताची वाट..
"सामान्यांच्या प्रयत्नातून असामान्यांच्या कलेला वाव" हे ब्रीद मनाशी घेऊन We Us N' Our Foundation ने चालू केलेल्या समाजबंधन या इव्हेंट चा हा शेवटचा टप्पा..
मतिमंद मुलांची शाळा, टिळक रोड, अहमदनगर या शाळेतील मुलांना त्यांच्या राख्या बनविण्याच्या कलेला वाव देऊन त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याच्या हेतूने हा इव्हेंट चालू करण्यात आला. यामधे त्यांना राख्यांसाठी लागणारा कच्चा माल पुरवून त्यांच्याकडून राख्या बनवून घेण्यात आल्या व त्या राख्यांची विक्री करून मिळालेल्या मोबदल्यात त्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त साधने पुरविण्याचा संस्थेचा मानस होता. त्या दृष्टीकोनातूनच मिळालेल्या पैशांमधून त्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकासही होईल अशी साधने व खेळणी विकत घेऊन या दिवाळीनिमित्त दिनांक २६/१०/२०१९ रोजी त्यांचे वाटप करण्यात आले.
असे म्हणतात की अंधार हा कितीही भव्य आणि भडक असला तरी त्याचे काळीज चिरण्याची क्षमता ही एका छोट्याश्या दिव्यात असते. समाजातील दुर्बल घटकांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी असाच एक छोटासा दिवा लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि हा दिवा सदैव तेवत ठेवण्यासाठी आम्हाला तुमच्यासारख्या रक्षणकर्त्या व मदतीस धावून येणाऱ्या हातांची गरज आहे. तुम्हा सर्वांचे मिळालेले प्रेम व प्रतिसाद पाहता या दिव्याची ज्योत अशीच अखंड तेवत राहील यात तीळमात्रही शंका नाही.